Wednesday, April 6, 2011

लोणावळा : भाग २ - एक प्रयत्न आयुष्याकड़े पाहण्याचा

थोड्यावेळ गाडीत झोप काढायच ठरवल पण झोप काही येत नव्हती. साधारण १० च्या सुमारास मी लोणावळा स्टेशन वर उतरलो. वडिलांचा एक मित्र अगोदरच स्टेशन वर आला होता. त्याच्या बाइक वरून आम्ही पाहिले अन्नपूर्णा होटेल मध्ये गेलो. स्टेशन पासून चालत १० मिनिटांच्या अंतरावर हे होटेल आहे. (नाश्ता करण्यासाठी हे चांगल होटेल आहे.) आम्ही नाश्ता उरकला आणि निघालो. ठरलेल्या ठिकाणी पोहचलो. माझ २-३ तासांच काम होत. ते उरकल आणि आम्ही निघालो.

काम अपेक्षेपेक्षा लवकर झाल होत. एक होटेल मध्ये दुपारच जेवण उरकल आणि वेळ होता म्हणून त्या माणसाच्या घरी गेलो. सिंहगड युनिव्हर्सिटीच्या पायथ्याशी त्याच घर आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरून तुम्ही जात असाल तर डाव्या हाताला तुम्हाला डोंगरात  उभारलेली सिंहगड युनिव्हर्सिटी दिसते. संध्याकाळी एक्सप्रेस मार्गावरून खुप विलोभनीय दृश्य दिसत. डोंगरापलिकडे अस्ताला चाललेला सूर्य. युनिव्हर्सिटीवर पडणारी मावळत्या सुर्याची किरणे. डोंगरांना कापत निघालेला मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे. क्षितिजावर चढ़णारी संध्याकाळची नशा. थंड वारयाची लाट. सर्वच कस सुंदर. शब्दात मांडता न येण्याजोग. जस जस सिंहगड युनिव्हर्सिटीच्या पायथ्याशी येत होतो. तस तस आठवणी दृष्टी पटलावर येत होत्या. वाटत होत निघाव गाड़ी घेवुन मुंबई पुणे हायवे वर, थांबाव त्या ठिकाणी, पाहत रहाव त्या अस्ताला जाणार्या सुर्याला. त्या मोहक दृश्याला. तेवढ्यात आम्ही त्याच्या घरी आलो. थोडा वेळ थांबलो आणि निघालो कारण परतीचा प्रवास करायचा होता. तसे २ तास माझ्या हातात होते पण त्याला दुसर काही काम होत म्हणून मी शेवटचे २ तास स्टेशन वर थांबायच ठरवल.

स्टेशन वर आलो. स्टेशन वरचे सर्व पंखे बंद होते. सर्व इंडिकेटर बंद होते. गरमा बऱ्यापैकी जाणवत होता. बसण्यासाठी जागा शोधत होतो. थोडा पुढे आलो. तिथे एक खुर्च्यांची रांग होती. तिथे एक मुलगी बसली होती. आमच्या दोघांमध्ये एक खुर्चीच अंतर ठेवून मी बसलो. तिने कुठलातरी भारी परफ्यूम लावला होता. त्यामुळे त्या उकाड्यातही एक फ्रेशनेस जाणवत होता. ती काही शांत बसली नव्हती. मोबाईल चेक करत होती. बैग उघडत होती. कुठलीतरी क्रीम काढून ओठांना लावत होती. एक सेकंदा पुरता वाटुन गेल किती काम असतात मुलींना. नेहमी बिझी असतात त्या :-) थोड्या वेळाने तिच्या प्रियकाराचा फ़ोन आला असावा कारण बोलत बोलत ती निघून गेली. एखाद वेळेस स्टेशन बाहेर तो तिची वाट पाहत असावा. ती गेल्यावर सहज आजुबाजुला नजर फिरवली. तर कोणी स्टेशन वर रांग लावून उभे होते. कोणी शांत बसून होते. कोणी त्या उकाड्यातही झोपा काढत होते. तेंव्हा मला एवढ कळल की माणसाला खरच झोप आली असेल तर ए.सी., पंखा, गादी ह्या गोष्टींची गरज नाही पडत. एक लाकडी बाकडा सुद्धा पुरतो. सकाळी ए.सी. कोच मधल्या पुशबेक सीटवर सुद्धा मला झोप येत नव्हती. असो.

थोड्या वेळाने २ मुली आणि १ मुलगा खुप सार लगेज घेवुन स्टेशन वर आले. त्यातले १ मुलगा आणि १ मुलगी (बहुतेक ते कपल असावेत) कुठेतरी गेले. उरलेली एक मुलगी सामानावर लक्ष ठेवण्यासाठी तिथेच थांबली. तिलाही काही काम नव्हत. मलाही काही काम नव्हत. मी कधी तिच्याकडे पाहत होतो तर कधी ती माझ्याकडे. वेळ घालावण हच एक उद्देश होता तिचा आणि माझा :-) वेळ जाता जाता जात नव्हता. शेवटचा एक तास राहिला होता. अजूनही पुढे २ तास प्रवास करून मी घरी पोहचणार होतो. किती कंटाळा आला होता काय सांगू तुम्हाला. पण एक खुप चांगली गोष्ट घडली. एक सुंदर मुलगी स्टेशनवरच्या त्या रांगेत येवून उभी राहिली. ती रांग जनरल डब्यासाठी होती. लोणावळ्याला २ जनरल डब्बे उघडले जातात मुंबईसाठी. गाडी आल्यावर लोकांना रांगेने सोडल जात डब्यात. असो. पण तिला पाहिल्यावर कंटाळा कुठल्याकुठे निघून गेला. दिसायला खुप भारी होती राव. लाल रंगाचा टॉप, ब्लैक जीन्स, मनगटावर एक स्टायलिश घड्याळ, डोळ्यांवर एक मोठा गोगल, केस घट्ट बांधलेले, कानात इअर फ़ोन, हातात मोबाईल असा काहीसा तिचा गेटअप होता. त्या वेळेस त्या स्टेशन वर तीच एक सुंदर मुलगी होती. तिच्यावरून नजर हटण कठीण होत. तिलाही कळल की मी तिच्याकडे पाहत आहे. कधी ती माझ्याकडे पाहत होती तर कधी मी तिच्याकडे. पण गाडी येण्याची वेळ झाली आणि मी ए.सी. चा डब्बा जिथे येणार होता तिथे जावून उभा राहिलो.

थोड्यावेळातच गाडी आली. ए.सी. मध्ये विंडो सीट भेटली होती. सकाळी मी ह्याच गाडीने आलो होतो आणि ह्याच गाडीने घरी चाललो होतो. सकाळच्या प्रवासाची ती खतरनाक सुरवात, चाळीशी पार केलेला तो ग्रुप, एक्सप्रेस हायवे च्या त्या आठवणी, लोणावळा स्टेशन वरची ती मुलगी, अशा खुप आठवणी मनात साठवुन मी परतीच्या प्रवासाला लागलो.

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

अभिजीत

Tuesday, April 5, 2011

लोणावळा : भाग १ - एक प्रयत्न आयुष्याकड़े पाहण्याचा

सुमारे एक दिड महीन्यानंतर ह्या ब्लॉगवर पोस्ट टाकत आहे. ह्या दरम्यान बाकीच्या माझ्या २ ब्लॉग वर मी अधून मधून पोस्ट टाकत होतोच. तुम्ही आता पर्यंत माझ्या तिन्ही ब्लॉगला दिलेला प्रतिसाद पाहून खुप बर वाटल. मी ठाण्यात राहतो. जेंव्हा माझ्या ब्लॉगला भारता बाहेरून विझिट दिल्या जातात त्या वेळेच्या भावना मला शब्दात नाही व्यक्त करता येणार. मला ओळखणारे माझे ब्लॉग वाचत आहेतच. जे माझ्यासाठी अनोळखी आहेत तरीही वारंवार माझ्या ब्लॉगला ज्यांच्या विझिट आहेत. अशा सर्व व्यक्तींचे मनापासून आभार. मी लेखक नाही. मी एक सामान्य व्यक्ति तरीही एक प्रयत्न आयुष्याकड़े पाहण्याचा.

गेल्या आठवड्यात लोणावळ्याला गेलो होतो. काम होत थोड. जाण्या-येण्याच रेल्वेच ए.सी.च बुकिंग अगोदरच केल होत. प्रवास सर्वात जास्त सुखकर कसा होइल ह्या कड़े माझ नेहमी लक्ष असत. असो. सकाळची ट्रेन होती. मी माझ्या आरक्षित असलेल्या सीटवर जावून बसलो. प्रवासाची सुरवात एकदम खतरनाक झाली. माझी सीट अगोदरच कोणीतरी पुशबेक करून ठेवली होती. म्हणून मी बटन प्रेस करून सीट पूर्ववत केली. पण त्यावेळेस  माझ्या लक्षात नाही आली की माझ्या पाठी जे गृहस्थ बसले होते त्यांनी माझ्या सीटला अटेच असलेल्या स्टैंड वर चहाचा कप ठेवला होता. बटन प्रेस करताच सीट पुढे ढकलली गेली आणि त्यांचा चहाचा कप खाली पडला. फ्लोअरवर सर्वत्र चहा होता वाटल आता काहीतरी भांडण होइल. पण त्यांना ही कळल की चुकी माझी नव्हती. भांडण काही झाल नाही आणि प्रवास सुरु झाला. कल्याण गेल आणि टी.सी. आला. एक व्यक्तिच आणि टी.सी. च वाजल. त्या व्यक्तीला बसण्यासाठी जागा हावी होती. त्यावरून त्या दोघां मध्ये काही तरी वाजल होत. त्या व्यक्तीचा एक ग्रुप होता. त्यामध्ये ३ पुरुष मंडळी आणि २ बायका होत्या. असे एकून ते ५-६ जण होते.

त्या २ बायका अशा काही बसण्यासाठी जागा शोधत होत्या की काही विचारू नका. शेवटी नेरळला काही लोक उतरले आणि त्या सर्वांना जागा भेटली. बसण्यासाठी सीट मिळण हा आयुष्यातला सर्वात मोठा आनंद असू शकतो हे त्या दिवशी मला कळल. जागा भेटता क्षणी त्यांनी लैपटॉप चालू केला आणि फोटो पाहू लागले. बेकग्राउंडला जुन्या गोलमाल मधल "आने वाला पल" हे गाण लावल. थोडक्यात काय तर एक माहोल बनवला जो त्यांना भूतकाळातल्या गोड आठवणीं मध्ये घेवुन जाइल. ते सर्वजण फोटो पाहत होते. एकमेकांवर कमेंट पास करत होते. काही उगाचच शो-शायनिंग करत होते. आपल स्थान ह्या ग्रुप मध्ये किती प्रभावी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते. कोणी फिलोसोफी झाड़त होत. कोणी फॅमिली बद्दल बोलत होत. कोणी सेंटर ऑफ़ अट्रेक्शन बनण्याचा प्रयत्न करत होत. तरीही सर्वजण एकमेकांना पाठिंबा देत होते. एकमेकांचे नखरे मनापासून सहन करत होते. पुढचे पिकनिकचे प्लान ठरवत होते. त्यातील सर्वजणांनी चाळीसी पार केली असेल. एक व्यक्ति म्हणून प्रत्येकजण वेगळा असला तरी एक ग्रुप म्हणून ते एकत्र होते. माझ्या मते ग्रुप हा असाच असावा.

उर्वरित भाग पुढच्या पोस्ट मध्ये. 

चला, निरोप घेतो. परत भेटूच.

क्रमशः

अभिजीत